Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू

गोरेगावमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग, 40 जण जखमी

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईतील गोरेगाव पश्‍चिम येथील एका पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 40 जण जखम

तुमचे आजचे राशीचक्र बुधवार, १३ एप्रिल २०२२ l पहा LokNews24
माझा दोष नाही…माझी फसवणूक झाली…मला माफ करा…
नागरिकांनी नियम पाळले नाही तर लॉकडाऊन अटळ – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईतील गोरेगाव पश्‍चिम येथील एका पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 40 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही आग एवढी भयंकर होती, की दूरवरून आगीचे आणि धुराचे लोळ दिसत होते.
गोरेगाव पश्‍चिमला असलेल्या मोतीलाल नगर 3 येथील पाच मजली इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास अचानक आग लागली होती. त्यात तब्बल 51 जण होरपळले. त्यापैकी 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. 35 जणांवर उपचार सुरू आहेत. 4 किरकोळ जखमींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आगीमुळे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी असणारी अनेक वाहने जळून खाक झाली. यामध्ये 4 कार आणि जवळपास 30 दुचाकींचा समावेश आहे. आग कशामुळे लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍याने सांगितले की, गोरेगाव पश्‍चिम येथील आझाद नगर भागातील जय भवानी बिल्डिंगला पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. आगीत जखमी झालेल्यांना जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा सेंटर आणि जुहू येथील कूपर रुग्णालयात नेण्यात आले. यातील दोन अल्पवयीन आणि दोन महिलांसह सात जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे चार तास लागले. आठहून अधिक अग्निशमन दलांनी आग आटोक्यात आणली, असे अधिकार्‍याने सांगितले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये बरेच जुने कपडे ठेवलेले होते, त्यामुळे आग लागली असावी आणि काही वेळातच आग संपूर्ण पार्किंग आणि इमारतीच्या पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यापर्यंत पसरली.

दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना चहल म्हणाले की, घडलेली घटना अतिशय दु:खद आहे. ही इमारत एसआरए प्रोजेक्टची असून या बिल्डिंगमध्ये वाघरी समाजाच्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात कपडे साठवण्यात आले होते. या कपड्यांना आग लागली आणि संपूर्ण बिल्डिंगमध्ये पसरली, अशी माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. ही आग कशामुळे लागली हे अद्याप उघड झाले नाही. पण प्राथामिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे. इमारतीतील लोकांचा मृत्यू आगीत होरपळून झाला नाही. तर आगीमुळे झालेल्या धुरामुळे त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला, अशी धक्कादायक माहिती सुद्धा इकबाल सिंह चहल यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखाची आर्थिक मदत जाहीर- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ’मी सातत्याने महापालिका आयुक्त आणि पोलिसांशी बोलत आहे. जे झाले ते दुर्दैवी आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबीयांना सरकार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. जखमींवर शासनाकडून उपचार केले जातील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, गोरेगाव येथील आगीच्या घटनेत जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल दुःख झाले. आम्ही बीएमसी आणि मुंबई पोलिस अधिकार्‍यांच्या संपर्कात आहोत आणि सर्व मदत केली जात आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS