सोयीचे राजकारण

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सोयीचे राजकारण

महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. राणे यांचे बेताल वक्तव्य आणि त्यानंतर झालेली अटक आणि शिवसे

अजित पवार जाणार केंद्रात, सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? कशी सुरु आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची खेळी? l पहा LokNews24
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा : अजित पवार
अजित पवार यांचा कोल्हापूर आणि सांगली पुरपरिस्थितीचा पाहणी दौरा! l पहा LokNews24

महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. राणे यांचे बेताल वक्तव्य आणि त्यानंतर झालेली अटक आणि शिवसेना आणि भाजपचा दूरावा वाढत असतांना, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड घेतलेल्या भेटीनंतर भाजपची भूमिका मवाळ झाल्याचे पहायला मिळाले. शिवसेना आज जरी महाविकास आघाडीसोबत असला, तरी भविष्यात शिवसेना आपल्यासेाबत येऊ शकतो, याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जास्तीत जास्त जुळवून घेण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येतो. राज्यात एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न असले, तरी देखील तीन मुख्य पक्ष एकत्र आल्यानंतर भाजपची एकहाती सत्ता येणे अशक्य आहे. एकीकडे भाजपमध्ये घेऊन राणे यांना शिवसेनेवर जहरी टीका करण्यासाठी सोडायचे आणि दुसरीकडे राज्यातील नेत्यांनी शिवसेनेसोबत मवाळ भूमिका घेत सोयीचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू असु शकत नाही. त्यामुळे आजची महाविकास आघाडी उद्या असू शकेल, याची शाश्‍वती नाही. तर दुसरीकडे आज शत्रुत्व असलेले भाजप-शिवसेना भविष्यात एकत्र येणार नाही, यावर देखील शिक्कामोर्तब करता येत नाही. भविष्यात राजकारणात जसे दिवस येतील, त्यादिशेने राजकारण झुकत असते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात बेबनाव निर्माण झाल्यामुळे प्रचंड कडवटपणा निर्माण झाला. पहाटेच्या शपथविधीनंतर सरकार टिकवू न शकल्याने भाजपा हा पक्ष बचावात्मक भूमिकेत गेला. राज्यातील राजकीय वातावरण बरेच दिवस अतिशय एकतर्फी होते. सरकारच्या वतीने अनेकांनी भाजपाला टोमणे मारावेत आणि समाज माध्यमांवर यथेच्छ टिंगल करावी, असे सुरू होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. प्रशासकांचा कोणताही अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर देखील बर्‍याच प्रमाणात टीका झाली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करत राज्याचा गाडा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यामुळे फडणवीस यांचे महत्व झाकोळणार नाही, याकडे ते कटाक्षाने लक्ष देत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रति झालेले बेताल वक्तव्य आणि त्यातून झालेल्या अटक नाट्य आणि राडा तसेच शिवसेना आणि भाजप यामध्ये झालेल्या तीव्र संघर्षात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा कंपू हा फारसा आक्रमक राहिला नाही. कारण गेल्या विधानसभा निवडणूकांवेळी फडणवीस यांच्या स्पर्धेत असणार्‍या अनेक उमेदवारांचा पराभव झाला, किंवा त्यांचे खच्चीकरण तरी करण्यात आले. विशेष म्हणजे एकेकाळी फडणवीस यांच्या खास गोटामधील समजले जाणार्‍या प्रसाद लाड यांची राणे प्रति अचानक उफाळून आलेली निष्ठा ही अचंबित करणारी होती. लाड यांचे साहेबांना भरल्या ताटावरून अटक करण्यात आल्याचा सूर, त्यांच्या पाठीमागे सातत्याने राहण्याची भूमिका अचंबित करणारी होती. शेलार, मुंडे, तावडे, मुनगंटीवार ही मंडळी फडणवीस विरोधी गटातील मानली जातात. पक्षांतर्गत गटबाजीमध्ये फडणवीस यांनी आपला खुंटा भक्कम करताना पक्षांतर्गत अनेक प्रबळ नेत्यांना अस्तित्वहीन केले आहे. आपला गट अढळ आणि ताकदवान होण्यासाठी जे जे शक्य ते करण्यात फडणवीस मागे राहिलेले नाहीत. राज्यात पक्षाचा एकमेव बाहुबली नेता आहे हे सिद्ध करण्यात ते यशस्वी झाले.राजकारणातही अनेक लाटा येतात आणि जातात. माजी मुख्यमंत्री आणि आक्रमक स्वभाव अशी ओळख असलेल्या नारायण राणे यांचा भाजप मधील पक्षप्रवेश हा फडणवीस यांच्यासाठी धोक्याचाच होता. त्यामुळे राणे यांचा पक्षप्रवेश होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण दिल्लीतील पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या आदेशापुढे काहीही न चालल्याने फडणवीस यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले. आणि आता त्याच राणेंच्या मदतीने भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना दूरावत चालला आहे. राणेंना वाटते भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ नये, यासाठी ते जहरी टीका करतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसला देखील शिवसेना आणि भाजप एकत्र न येता त्यांच्यात दूरी कशी वाढेल, याची परस्पर काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेे राज्यात पक्षाच्या सोयीचे राजकारण सुरू आहे. मात्र लोकांच्या सोयीचे राजकारण अद्याप सुरू होण्याची शक्यता तशी कमीच आहे.

COMMENTS