सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशारा दिला.
पंढरपूर/प्रतिनिधी : सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशारा दिला. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात फडणवीस यांची जाहीर सभा झाली. ‘लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतेय का? अरे सरकार बदलायचे माझ्यावर सोडा, मी बघतो; पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. या सरकारचा भ्रष्टाचार पाहून त्याला जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, असे ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात सभा घेण्याची वेळ आली नसती तर बरे झाले असते; परंतु पोटनिवडणूक लागली. राष्ट्रवादीचे नेते आले आणि मुक्ताफळे उधळून गेले, म्हणून आम्हाला यावे लागले. आतापर्यंत शक्ती विभागली होती पण आता ती एकवटली असल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 15 वर्षांत एक पैसा दिला नाही, आता देऊ-देऊ म्हणून सांगत आहेत. गरीबांचे मीटर कट करून पाच-पाच हजार रुपये गोळा केले. हे सरकार तयार झाले, तेव्हा महाविकास आघाडी म्हणून ओळखले जात होते; पण आता ते महावसुली आघाडी सरकार म्हणून ओळखले जाते, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले, की सरकारमध्ये आले तेव्हा बांधावर जावून सांगायचे 50 हजार देऊ; पण दोन हजार रुपयेही दिले नाहीत. कर्जमाफी करू म्हणले; पण कोणतीही कर्जमाफी केली नाही. उसाला एफआरपी फक्त मोदी सरकारमुळे मिळते आहे. हजारो रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने दिले. मोदी सरकार शेतकर्यांची चिंता करीत आहे. या भागात पाच हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यावर कनेक्टिव्हिटी मिळेल, मोठी बाजारपेठ निर्माण होईल. समाधान आवताडेंना निवडून द्या. 35 गावांसाठी मोदींकडून पैसे आणून देतो, असा दावाही फडणवीस यांनी केला.
COMMENTS