भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहराला अतिरिक्त वीस लाख लीटर पाणी देण्यास मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली.
मुंबई/प्रतिनिधीः भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहराला अतिरिक्त वीस लाख लीटर पाणी देण्यास मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली. भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी हा वाढीव पाणीकोटा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या संदर्भात आयुक्तांनी खासदार पाटील यांना पत्र पाठवून वाढीव पाणीकोटा मंजूर केल्याची माहिती दिली.
भिवंडी-निजामपूर शहरातील लोकसंख्येत वाढत असून दाट लोकवस्तीच्या भागात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. यंत्रमाग नगरीबरोबरच गोदामांमध्ये काम करणारे कामगार भिवंडी शहरातच वास्तव्य करतात. वाढत्या शहरीकरणामुळे पाणीटंचाई निर्माण होत आहे. मुंबई महापालिकेबरोबरच भिवंडी शहराला स्टेमकडूनही पाणीपुरवठा केला जातो. मुंबई महापालिकेकडून शहराला दररोज चार कोटी 40ल लाख लीटर पाणीपुरवठा करण्यात येत होता; मात्र तो अपुरा पडत आहे. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी खासदार पाटील यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठविले होते. तसेच त्यांच्याबरोबर चर्चाही केली होती. अखेर मुंबई महापालिकेने वाढीव वीस लाख लीटर पाणीपुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. भिवंडी महापालिकेने तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर जलजोडणी देण्यात येणार असल्याचे आयुक्त चहल यांनी पाटील यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भिवंडीवासीयांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईतून काहीसा दिलासा मिळणार आहे.
COMMENTS