कोरोनामुळे मृत झालेल्यांवर नगरमध्येच अंत्यसंस्कार व्हावेत ; युवा सेना जिल्हा प्रमुखांची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनामुळे मृत झालेल्यांवर नगरमध्येच अंत्यसंस्कार व्हावेत ; युवा सेना जिल्हा प्रमुखांची मागणी

कोरोनाच्या काळात कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता सर्व अंत्यविधी नगर शहरात करण्याचे चालू ठेवावे, अशी मागणी करणारे निवेदन नगर जिल्हा युवा सेनेचे प्रमुख विक्रम राठोड यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

पीक कर्जाचे व्याज सभासदांना परत करणार ः अमोल राळेभात
कोयत्याचा धाक दाखवून चौघांनी टेम्पो चालकास लुटले
एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये जागृती सप्ताहाचा समारोप

अहमदनगर/प्रतिनिधी :  कोरोनाच्या काळात कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता सर्व अंत्यविधी नगर शहरात करण्याचे चालू ठेवावे, अशी मागणी करणारे निवेदन नगर जिल्हा युवा सेनेचे प्रमुख विक्रम राठोड यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. याबाबतचा ई-मेल त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठविला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या व्हॉट्स अप नंबरवर हे निवेदन पाठविण्यात आले आहे.

राठोड यांनी यात म्हटले आहे की, सध्या नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे रुग्ण

दगावण्याचा संख्येत वाढ होत आहे. दररोज मृतांचा आकडा 60 ते 65 च्या घरात जात आहे. या परिस्थितीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतांचे अंत्यविधी नगरच्या अमरधाम स्मशानभूमीत करण्यात येतात. यामुळे नगरच्या अमरधाम स्मशान भूमीवर ताण येत असला तरी हे अंत्यविधी नगर शहरातच व्हावेत. जे दगावलेले रुग्ण नगर शहराबाहेरील आहेत, त्यांचा अंत्यविधी त्या-त्या गावात करण्याचा विचार करू नये. कारण, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे, अशी भीतीही यात व्यक्त करण्यात आली आहे. नगर शहरात जे रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडतात, त्यांचा अंत्यविधी नगरच्या अमरधाम स्मशानभूमीत केले जातात. त्यावेळी अहमदनगर मनपाचे कर्मचारी तसेच अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडणारे सर्वजण या रोगाचा संसर्ग होणार नाही, याची दक्षता बाळगून काम करतात. पण जर हे अंत्यसंस्कार इतरत्र कोठेही करण्याची परवानगी दिल्यास प्रत्येक ठिकाणी कोरोना संसर्ग न होण्याबाबत काळजी घेतली जाणार नाही, असाही दावा यात केला गेला आहे. नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयात नगर जिल्ह्यातून तसेच नगर जिल्ह्याच्या बाहेरून आलेले गोरगरीब रुग्ण उपचार घेत आहेत. या कोरोनाच्या काळात यापैकी मृत झालेले रुग्ण पालिकेने अंत्यसंस्कारासाठी ताब्यात न घेता त्या-त्या नातेवाईकाकडे दिले तर ते चुकीचे ठरेल. कारण, प्रत्येक ठिकाणी असे अंत्यसंस्कार केले गेल्यास त्या-त्या गावात अंत्यविधीवेळी उपस्थित असलेल्या लोकांना या रोगाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना काळात मृताचे नातेवाईक देखील मृतदेहास हात लावत नाहीत व लांबूनच दर्शन घेतात तसेच अंत्यसंस्कार करणारे पीपीई किट घालून खबरदारी बाळगतात. अशा स्थितीत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय हा माणुसकीला धरून नाही. त्यामुळे याचा विचार करावा, असे राठोड यांनी म्हटले आहे.

पर्यायांचा विचार करावा

रुग्ण मृत होण्याची संख्या वाढल्यामुळे खरे तर नगरच्या अमरधामातील विद्युत दाहिनीवर मोठा ताण आलेला आहे तसेच अमरधाममध्ये लाकडावर अग्नी डाग देण्यासाठी जागा शिल्लक राहात नाही. तेव्हा नगर मनपा केडगाव, बोल्हेगाव, भिंगार आणि रेल्वेस्टेशन येथील स्मशानभूमीचा वापर करू शकते. तिथे उरलेले अंत्यविधी करण्यास हरकत नाही. पण संपूर्ण नगर जिल्ह्यात त्या-त्या गावी अंत्यविधी करण्याचे ठरविण्यात आल्यास रोगाचा संसर्ग वाढून आणखी परिस्थिती गंभीर होण्याचा धोका प्रशासनाने पत्करू नये, असेही राठोड यांनी या निवेदनात आवर्जून स्पष्ट केले आहे.

COMMENTS