आरोपांच्या मालिकेद्वारे भाजपची सत्तेसाठी धडपड ; रोहित पवार यांची टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोपांच्या मालिकेद्वारे भाजपची सत्तेसाठी धडपड ; रोहित पवार यांची टीका

लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी आणि सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमके काय होत आहे

Sangamner : गटार पाणी जलशुद्धीकरण प्रकलपाला भाजपाचा तीव्र विरोध (Video)
अहमदनगरमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीची पुन्हा दिसून आली एकी….
श्री साईबाबांच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना

अहमदनगर/प्रतिनिधी: लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी आणि सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमके काय होत आहे, कशासाठी होत आहे आणि कोण करते आहे, याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल, असे सूचक ट्वीटआमदार रोहित पवार यांनी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ता आणण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 

रोहित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी घडलेल्या गोष्टींबाबतची निरीक्षणे नोंदवली आहेत. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतची माहिती दिली; मात्र त्याचवेळी पवारांना अडचणीत आणणारे प्रश्‍न विचारण्यात आले. पुरावे म्हणून देशमुख यांचे व्हिडीओही दाखवण्यात आले. पत्रकारांकडे हे सर्व मुद्दे आले कुठून?, त्यांना कोण माहिती पुरवत होते, असा प्रश्‍न विचारला जात आहे. त्यावर रोहित यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पवार यांची पत्रकार परिषद सुरू होताच भाजपचे सर्व नेते सोशल मीडियावर सक्रिय झाले होते. पवार यांच्या मुद्द्यांवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया देत होते. तसेच बरीच माहितीही पुरवत होते. यामागे भाजपचा मोठा प्लॅन दिसतोय, असे रोहित म्हणाले. विरोधकांकडून सातत्याने खोटी माहिती देऊन संभ्रम निर्माण केला जात आहे. केंद्र सरकारकडे अनेक प्रश्‍न पडले आहेत. त्यावर कोणी बोलताना दिसत नाही;परंतु असे काही विषय आल्यावर हे लोक बोलायला लागतात. याचे वाईट वाटते, असे सांगतानाच सुशांतसिंह प्रकरणातदेखील विरोधकांनी राजकारण केले. आता देखील दोन महिने हे प्रकरण तापवतील. त्यानंतर सत्य बाहेर येईल, असे रोहित यांनी सांगितले. सरकारच्या अडचणी खरोखरच वाढल्या आहेत की विरोधक तसा भास निर्माण करतात, हे समजून घेतले पाहिजे; पण विरोधकांनी कितीही काहीही केले, तरी हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावाही त्यांनी केला.

राजकीय ताकद मिळाली का?

मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी पत्रात ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत, त्यातील तारखांचा मेळ लागत नाही. पदावर असताना त्या अधिकार्‍याने कोणाला काहीच सांगितले नाही. पद गेल्यावरच इतक्या आत्मविश्‍वासाने हा विषय मांडला. त्यामुळे त्यांना राजकीय ताकद मिळाली की काय, असा संशय लोकांमध्ये निर्माण झाला आहे. यात मोठ्या प्रमाणात राजकारण केले जात आहे. तसेच या गोष्टीमुळे राजकीय युती होते की काय? असा संशय घेण्यासही वाव आहे, असेही ते म्हणाले.

COMMENTS