महाराष्ट्राची संस्कृती लयास जात असल्याची ओरड, गेल्या काही वर्षांपासून आता सुरू झाली आहे. खास करून राजकारणातून ही संस्कृती सध्या हद्दपार झालेली द

महाराष्ट्राची संस्कृती लयास जात असल्याची ओरड, गेल्या काही वर्षांपासून आता सुरू झाली आहे. खास करून राजकारणातून ही संस्कृती सध्या हद्दपार झालेली दिसते. त्यामुळेच, काल दसरा मेळावा शिवसेनेच्या ज्या दोन गटांनी घेतला त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याशिवाय दुसरं काहीही साध्य केलं नाही. यापूर्वी, दसरा मेळावा म्हणजे राजकारण, धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण यावर बाळासाहेब ठाकरे यांचं आक्रमक विश्लेषण किंवा भाषण असणं आणि त्याची ओढ महाराष्ट्रातील तमाम जनतेला असायची. पण, आता एकाच पक्षाचे दोन भाग एकमेकांना संपवण्याचाच विचार करत असल्याने, त्यांच्या दसरा मेळाव्यात चिखलफेकपलीकडे काहीही सापडत नाही! अर्थात, उद्धव ठाकरे यांचं भाषण सरकारला घेरणार होतं. तर, एकनाथ शिंदे यांचे भाषण उद्धव ठाकरेंना घेरणार होतं. यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे नेमकं काय बोललं गेलं, हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर शून्य असं आहे. सत्तेवर असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं संपूर्ण भाषण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात व्यतीत केलं; तर, उद्धव ठाकरे यांनी आपलं संपूर्ण भाषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात व्यतीत केलं. त्यामुळे, जनतेच्या हिताचं या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जी काही भाषणं किंवा कार्यक्रम झाले, यामध्ये काहीही हाती लागलं नाही. त्यातच, आजपासून जवळपास १३ वर्षांपूर्वी ज्या शिवसेनेच्या संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झालं होतं, त्या संदर्भात रामदास कदम यांनी केलेलं भाष्य, हे नैतिकते च्या विरोधात आहे. किंबहुना, ज्या पक्षात, राजकारणात, सत्तेत किंवा प्रशासनात व्यक्ती असेल त्या ठिकाणी, शासन आणि प्रशासन अशा ठिकाणी, कुठलेही पद घेताना पद आणि गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. त्याचे पत्यक्षात पालनही करावं लागतं. परंतु, आमदार, मंत्री आणि पक्षातील विविध पदे भूषवलेले रामदास कदम यांना अजूनही अशा पद आणि गोपनितेचे महत्व दिसत नाही. एका अर्थाने राजकारणातलं सांस्कृतिक खच्चीकरण किंवा सांस्कृतिक अवनती ज्याला म्हणावं, तो हा प्रकार आहे. तो त्यांनी उघडपणे केला. एखाद्या नेता जो जन माणसांमध्ये लोकप्रिय असं व्यक्तिमत्व असण्याचा इतिहास आहे, अशा व्यक्ती विषयी वक्तव्य करताना तारतम्य बाळगणे गरजेचं आहे. मात्र, सध्या प्रसारमाध्यमांचे ही ताळतंत्र सुटलेले आहे. त्यामुळे, कुठल्या गोष्टीला आपण अधिक प्रसिद्धी द्यावी याचेही भान राहिले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस घरात पडून होता, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. अर्थात, त्यांच्या या वक्तव्यासंबंधी वस्तुस्थिती काय आहे हे दोन्हीकडच्या नेत्यांना निश्चितपणे माहित आहे. परंतु, प्रत्यक्षात वस्तुस्थिती जी काही असेल, त्याचं एका दशकानंतर किंवा एका तपानंतर अस उघडपणे भाष्य करणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सांस्कृतिक दर्जा हा अवनतीला गेला आहे, हे समजावं आणि अशा प्रकारचं राजकारण करण्यात नेमके कोणाचे हितसंबंध आहेत हेही एकदा स्पष्ट व्हायला हवं. कारण, सध्याच्या काळात राजकीय नेते जनतेच्या प्रश्नांवर काम करणं सोडून केवळ एकमेकांचे टीकाकार बनले आहेत. ते टीकाकारच नव्हे तर एकमेकांशी त्यांनी अक्षरशः वैर घेतले आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोन्ही गटांकडून जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोक एकमेकांना केवळ वैरी म्हणून पहात आहेत. तर, मग जनतेचे प्रश्न नेमके सोडवतील कोण? ही चिंता जनतेला आजही भेडसावत आहे. मात्र, यावेळी, उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचूक यांचाही विषय हाताळला. यावेळी , बोलताना ते म्हणाले की, सोनम वांगचुक यांनी अतिशय दूर्गम भागात न्यायहक्कासाठी आंदोलन सुरू केलं. न्यायहक्क ही लोकशाहीतील मुलभूत गरज आहे. या लढाईसाठी उपोषण सुरु ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही. लेह-लडाखमध्ये तरूण पिढी रस्त्यावर आली. तेव्हा, त्यांना मोदी सरकारने रासुका कायद्याखाली आतमध्ये टाकलं. कारण मोदींची स्तुती करत होते, तोपर्यंत वांगचुक देशद्रोही नव्हते. आता त्यांना देशद्रोही ठरवलं जातंय.

COMMENTS