वर्धा अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू ; भाजप आमदार पुत्राचाही समावेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू ; भाजप आमदार पुत्राचाही समावेश

वर्धा/प्रतिनिधी : वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा येथे काल रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सावंगी इथल्या व

MPSC परीक्षेत अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या | LOK News 24
श्याम बेनेगल : सामान्य प्रेक्षकांपर्यंत न पोहचलेले दिग्दर्शक !
अखेर सुजीत पाटकरला पोलिसांनी केली अटक

वर्धा/प्रतिनिधी : वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा येथे काल रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सावंगी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातले हे विद्यार्थी होते. सातही विद्यार्थी सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते. यात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कारचाही समावेश आहे. मृतांमध्ये निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा-देवळी मार्गावर सोमवारी रात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघातात घडला. परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजकला धडकून गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. जवळपास 40 फूट खोल दरीत गाडी पडल्याने गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्याने वर्ध्याकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली. सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी सांगितले की, सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्री आणण्यात आले. यात तिरोडा येथील आमदारांचा मुलगा असल्याची चर्चा अपघातस्थळी मदत करणार्‍यांमध्ये होती. सातही मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

राज्यात दोन दिवसांत अपघातांची मालिका
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली अपघातांची मालिका अद्याप ही काही संपण्याची चिन्हे नाहीत. वर्ध्यातील मेडिकल कॉलेजमधील सात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे आता इथं मुंबई-पुणे मार्गावरही कंटनेरचा अपघात झाला आहे. सोमवारपासून सुरु झालेली अपघातांची मालिका अजूनही सुरुच आहेत. सोमवारी पुणे-नगर मार्गावर एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा जीव गेला होता. तर दुसरीकडे परभणीत ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तिघा भावंडांचा बळी गेला होता. खड्डा चुकवण्याच्या नादात खडलेल्या या अपघातातील तीन भावंडांपैकी दोघे सख्खे भाऊ दगावले होते.

केंद्राकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत
महाराष्ट्रात सेलुसरा येथे झालेल्या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

COMMENTS