Homeताज्या बातम्यासंपादकीय

अपारदर्शीता आणि शरद पवार !

 देशाच्या राजकारणात सक्रिय असणारे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांची अमिट छाप आहे, ते शरद पवार, यांचे राजकारण म्हणजे महाराष्ट्राला

पुस्तक खरेदीतील सामाजिक (अ) न्याय ! 
ओबीसी तरूणांना प्रशिक्षित करू !
दोन हत्येमुळे अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे 

 देशाच्या राजकारणात सक्रिय असणारे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांची अमिट छाप आहे, ते शरद पवार, यांचे राजकारण म्हणजे महाराष्ट्राला आजपर्यंत अनाकलीय असणारी गोष्ट आहे. राजकारणाचा पाया मजबूत करण्यासाठी ते नेहमी समाजकारणाच्या पायाला ठिसूळ करतात; ही बाब त्यांचं ‘पुलोद’ सरकार स्थापन झालं, त्यावेळा पासून महाराष्ट्राच्या समाजकारणात त्यांनी लीड घेऊन मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा त्याकाळचा केलेला ठराव आणि त्यानंतर महाराष्ट्राची झालेली सामाजिक स्थिती आणि राजकारणात शरद पवार यांचे निर्माण झालेले प्रस्थ, या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर, शरद पवारांचे राजकारण राजकीय पटलावर जसं दिसतं, तसं, प्रत्यक्षात असतं असं नाही! महाराष्ट्रात २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही वेळा भारतीय जनता पक्षाला सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली. २०१४ ला शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे, भाजपला अधिक जागा मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. या बिनशर्त पाठिंब्यानेच सुरुवातीचे दोन-तीन महिने भाजप सरकार महाराष्ट्रात सक्रिय होत! त्यांच्या या खेळी मागे शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रामुख्याने भाग होता; असं आजही राजकीय निरीक्षक म्हणत असतात! अर्थात, त्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्या मतभेदांमध्ये समझोता झाला आणि दोन्ही पक्ष सत्तास्थानी आले. २०१९ च्या निवडणुकीनंतर झालेला पहाटेचा शपथविधी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीची नंतर बनलेली सत्ता, या गोष्टींच्या संदर्भातही अनेक तर्कवितर्क होत राहिले. नंतर, अजित पवार यांनी जेव्हा अधिकृतपणे शरद पवार यांची साथ सोडली आणि महायुतीमध्ये दाखल झाले, त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजकारणाविषयी बऱ्याचश्या बाबी गौप्यस्फोट म्हणून सांगितल्या. परंतु, या काळात शरद पवार यांना महाराष्ट्राच्या जनतेची प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. या सहानुभूतीचे प्रत्यक्ष प्रमाण लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या एकंदरीत जागांवरून ही दिसते.

शरद पवार यांचे राजकारण महाराष्ट्राला अनाकलणीय आहे, असा आम्ही सुरुवातीला जेव्हा म्हटलं, ते आताही तसंच आहे. गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट कोणत्या विषयावर आहे, कोणत्या विषयावर होती, याविषयी ना भेटीच्या आधी ना भेटीच्या नंतर कोणतेही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. परंतु जनता आणि पत्रकार आपसात एक अंदाज काढत असतात आणि तो अंदाज म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भातच ते एकनाथ शिंदे यांना भेटले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्याच दरम्यान त्या बातमी मागची बातमी येते आणि शरद पवार ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीला जातात, त्याच दरम्यान अडाणी यांच्या ग्रुप मधील ही दोन अधिकारी मुख्यमंत्री यांच्या भेटीला आलेले असतात. अडाणी यांचा धारावी मधला विकास प्रकल्प, नवी मुंबई विमानतळात असलेली त्यांची मालकी, या सगळ्या बाबींमागे शरद पवार हे देखील आहेत, असं महाराष्ट्राच्या राजकीय जाणकारांना कायम वाटत असतं. दोन दिवसापूर्वी त्यांच्याविषयी वक्तव्य करताना, ओबीसी आरक्षण आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी असं म्हटलं की, शरद पवार यांनी ओबीसींच्या संदर्भात पारदर्शिता ठेवली असती तर, ते आतापर्यंत दोन ते तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते. प्रा. लक्ष्मण हाके यांच्या विधानात कोणतीही अतिशयोक्ती आहे, असं अजिबात नाही. राजकारण मूस्सद्दीपणाने, डावपेचांनीन लढवलं जातं, ही बाब एका मर्यादेपर्यंत कोणीही मान्य करतो. परंतु राजकारण कायमस्वरूपी अपारदर्शी पद्धतीनेच करणं म्हणजे जनतेची फसवणूक करणे, असा त्याचा अर्थ होतो.  जनता एका निश्चित काळानंतर ती गोष्ट आपल्या निरीक्षणात आणून, त्याविषयी ठोस भूमिका घेते. देशातील अनेक राजकीय नेते, नेतृत्व, त्यांनी उभे केलेले अनेक छोट्या पक्षांनी राजकीय सत्ता मिळवल्या आणि त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्री पदही मिळवलं. परंतु, शरद पवार यांच्या पक्षाला २५ वर्ष पूर्ण होण्याआधीच दुभंगाव लागलं आणि या दुभंगण्याची कारणे सांगताना, अजित पवार यांनी एक मुख्य कारण हे देखील सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक प्रयत्न करूनही, राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवता आलं नाही. याचा अर्थ शरद पवार यांचे राजकारण महाराष्ट्राच्या जनतेच्या पूर्णपणे लक्षात आले आहे. परंतु, त्यांचा पक्ष दुभंगल्यामुळे लोकसभेत आणि आता येणाऱ्या विधानसभेत त्यांच्या गटाला निश्चितपणे राजकीय यश मिळणार. परंतु जनतेला अपेक्षा अशी आहे की, त्यांनी आता अडाणी- अंबानी यांचे लाडकोड ज्या पद्धतीने चालवले आहेत, ते मात्र बंद करावे! या कॉर्पोरेट कुटुंबाबरोबरची मैत्री राजकीय सत्तेमध्ये आणली तर परिणामांना सामोरे जावे लागेल! जनता तितकी आता भोळी राहिलेली नाही.

COMMENTS