ओबीसी : अन्यायासाठी वापर आणि न्यायाची दिशा!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ओबीसी : अन्यायासाठी वापर आणि न्यायाची दिशा!

  ओबीसी संदर्भात आज जवळपास तीन ते चार घटनांचा उल्लेख करून त्यावर बोलणं महत्वाचे आहे. त्यातील सर्वात पहिली बाब म्हणजे राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्

बुद्धांचा जन्म या पृथ्वीतलावर होणे सर्वात दुर्लभ; पु.भिक्खु डॉ.सुमनवन्नो महाथेरो
पुण्यात शिवप्रेमी संघटनेच्या वतीने पुणे बंदची हाक 
गट शिक्षणाधिकार्‍यांना काढल्या जाणार नोटीसा ; शाळाबाह्य मुलांची माहितीच पाठवली नाही

  ओबीसी संदर्भात आज जवळपास तीन ते चार घटनांचा उल्लेख करून त्यावर बोलणं महत्वाचे आहे. त्यातील सर्वात पहिली बाब म्हणजे राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणारा निर्णय. यावर निर्णय आल्यावर बोलणे योग्य राहील, त्यामुळे त्यावर आज भाष्य करणे संयुक्तिक ठरणार नाही. दुसरी बाब जी उत्तर प्रदेशातील गोविंद वल्लभ पंत या सामाजिक – आर्थिक विषयांवर संशोधन करणाऱ्या संस्थेत ओबीसी प्राध्यापकांच्या जागा रिक्त असतानाही त्या भरल्या गेल्या नाहीत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती करून या शासकीय संस्थेत ओबीसी प्रवर्गातून योग्य उमेदवार उपलब्ध न झाल्याचे निखालस खोटे आणि लबाड सबब या संस्थेच्या व्यवस्थापनाने पुढे केली आहे. ओबीसी उमेदवारांचे अर्ज प्राप्त होवूनही संस्थेने त्यांना मुलाखतीसाठी बोलावले नाही, ही बाब उच्चजातीयांचा खुलेआम चालणारा जातीयवाद असून याविरोधात ओबीसी उमेदवारांनी कंबर कसली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. अन्यायाविरोधात लढण्याची उच्चजातीयांच्या अन्यायाविरोधात लढण्याची प्रवृत्ती ओबीसींमध्ये निर्माण होत आहे, ही एक आशावादी गोष्ट म्हणता येईल. त्याचवेळी महाराष्ट्रात नाशिक येथे मनसे चे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका ही ओबीसी विरोधी आहे, असे स्पष्टपणे म्हणावे लागेल. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज ठाकरे यांना विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणतात की, महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणात अडकवून ठेवायचे हे सगळे प्रकार असून त्यातून बाहेर यायला हवं, ही त्यांची भूमिका म्हणजे उच्चजातीय हितासाठी केलेली धूर्त चलाखी आहे. वास्तविक, राज ठाकरे हे सेनेत असतानाही आणि आता मनसेची वाटचाल करतानाही महाराष्ट्रातील ओबीसी युवकांच्या आधारावर आपली राजकीय शक्ती राखून आहेत. मात्र, त्याच ओबीसी युवकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा प्रश्न जेव्हा उभा राहतो, तेव्हा उच्चजातीय हितसंबंध राखणारी धूर्त चलाखी करतात. त्यामुळे, ओबीसी युवकांनी आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची स्वतंत्र भूमिका घेऊन, मनसेसह सर्वच जातीयवादी पक्षातून डिपार्चर घ्यायला हवे. नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हुकूमशाही थाटाचे राज यांचे वागणे-बोलणे लोकशाहीशी तर सुसंगत नाहीच; परंतु, पत्रकारांची अवमानना करणारे देखील आहे. भर पत्रकार परिषदेत पत्रकारांना एकेरी भाषेचा वापर करणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे न देता अपमानित करणे असले प्रकार जे ते करतात याचा सरळ अर्थ हा आहे की, बहुजन समाजातून येणाऱ्या पत्रकारांना जाणीवपूर्वक अपमानित करणे आणि उच्चजातीयांना खुष करणे असा त्यांचा खाक्या दिसतो. त्यांच्या पक्षता सर्व प्रमुख पदे वरच्या जातींना बहाल करायची आणि लढाऊ सैन्य म्हणून ओबीसींचा वापर हिंदुत्वाच्या नावावर करायचा याला आता बहुजन समाजातील तरूणांनी आणि खासकरून ओबीसी तरूणांनी ओळखायला हवं. ओबीसी तरूणांचा वापर करायचा आणि त्यांच्याच आरक्षणाला विरोध करायचा ही दुटप्पी भूमिका राज ठाकरे यांनी सोडावी नाहीतर ओबीसी तरूणांनी त्यांना सोडावं, हेच हिताचे राहील!  ओबीसींच्या संदर्भात आणखी एक महत्वपूर्ण घटना म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला आपल्या हिताची राजकीय भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते ओबीसी धर्म आणि आरक्षण अशा पेचात सापडला आहे. ओबीसी समाजाने धर्मांध पक्षांच्या जखडीतून बाहेर यावं. आरक्षण हा न्यायाचा लढा आहे. आरक्षणाचे हक्क मिळवण्याच्या लढ्यात ओबीसींचा धर्म बदलणार नाही, असे सांगत त्यांनी आपल्या न्याय्य हक्काचा लढा प्राधान्य क्रमाने द्यावा. आजच्या ओबीसी समाजाशी असणाऱ्या चारही बाबी याठिकाणी आम्ही उद्धृत केल्या आहेत. चारपैकी तीन घटना ओबीसी विरोधात दिसताहेत; तर, ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका ओबीसींच्या न्याय्यपूर्ण राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची आहे. ओबीसींनी आपल्या राजकीय भूमिका स्वतःच ठरवायला शिकावं, हा त्यांचा आग्रह खूप महत्वाचा आहे, असे आम्हाला वाटते. 

COMMENTS