धर्मद्वेषाचा उन्माद

Homeताज्या बातम्यासंपादकीय

धर्मद्वेषाचा उन्माद

पुढच्या दिड- दोन महिन्यानंतर आपल्याकडे पाऊस पडायला सुरुत होईल. पहिला पाऊस पडला आणि ओढे- नाले, खड्डे- खुड्डे, डबके- डूबके भरले की, डबक्यातले, खड्ड्यात

अतिक्रमण कुणाचे आहे ?
लोकसंख्यावाढ रोखण्याचे आव्हान
राजकीय सामना कोण जिंकणार ?

पुढच्या दिड- दोन महिन्यानंतर आपल्याकडे पाऊस पडायला सुरुत होईल. पहिला पाऊस पडला आणि ओढे- नाले, खड्डे- खुड्डे, डबके- डूबके भरले की, डबक्यातले, खड्ड्यातले, नाल्यातले बेडके ‘डराव युद्ध’ करून रात्री झोपू देत नाहीत. त्यांचा ‘भोंगा’ सुरुच असतो. ‘डराव… डराव… डराव… डराव’. डबके- डूबके हे त्यांचे विश्व असल्यामुळे त्यापलीकडे त्यांना काही माहित नसते. तसा हा त्यांचा ओरडण्याचा नैसर्गिक अधिकार आणि ‘हंगाम’ असल्यामुळे त्यांच्या हंगाम्याला विरोध करण्याचे काही कारणही नाही. पण, मुसळधार, मोठा दणक्याचा पाऊस सुरु झाला की, या बेडक्यांना त्यांची लायकी कळते आणि ते कुठे गायब होतात हे कळत देखील नाही. त्याचप्रमाणे व्यवस्थेमध्ये माणसांमधला राजकीय ‘हंगाम’ आपल्याकडे सुरु होतो तो पाच वर्षांनी. मग ती निवडणूक कुठलीही असो.

राजकीय मेघ गर्जना मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. यात माणसांच्या हंगामाचे वैशिष्ठ्य जरा बेडकांपेक्षा वेगळे असते. बेडक्यांच्या हंगामात रात्रीची शांतता भंग होते, तर माणसांच्या हंगामात दिवस- रात्र दोन्हीमधली शांतता भंग होते. बेडक्यांचे ‘डराव युद्ध’ हा त्यांच्या मिलनाचा काळ असतो. तसेच राजकारणातही एखाद्या पक्षासोबत ‘मिलन’ ( युती, आघाडी, मित्रपक्ष आदी. ) करण्यासाठी शक्तीचा अविष्कार दाखवावा लागतो. पण तो लोकांचे डोके भडकावणारा, धार्मिक तेढ निर्माण करणारा नसावा. मराठीत एक म्हण आहे, ‘आडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगतो’. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र असल्यामुळे कुणी कुणाच्या तोंडाला हात लावण्याचे कारण नाही. पण शांतता भंग होऊ नये इतके भान प्रत्येकाने ठेवणे अभिप्रेत. सध्याचे राजकीय वातावरण जरा गढूळ झाले आहे हे खरे. राज्यात आणि देशात ‘दंगल’ घडवण्याचे सर्व राजकीय पक्षांचे भाकीत. त्याला आपल्या पोलीस खात्याचा गुप्तचर विभागही अपवाद नाही. हे कशासाठी? सत्तेत येण्यासाठी? त्याच्यासाठी धार्मिक मुद्याचा लाळघोटीपणा  करण्याची काय गरज? सर्वच राजकीय मंडळींकडून सध्या जे वादग्रस्त विधाने केले जात आहेत, त्याचे प्रयोजन काय? निवडणूक हेच आहे तर, त्यासाठी विरोधकांकडे देशातील गरिबी, बेरोजगारी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, शिक्षण, आरोग्य, अन्याय- अत्याचार असे भरपूर मुद्दे आहेत. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या  विकासाच्या कामाची पावती द्यावी. लोकशाहीत असे राजकारण ठिक. यात धर्म कशासाठी? इस्लाम समाजाने त्यांचा धर्म घरात आणि मशिदीमध्ये ठेवावा. हिंदूंनी त्यांच्या घरात आणि मंदिरात त्यांचा धर्म ठेवावा. त्याच रस्त्यावर प्रदर्शन करायच कारण काय? आपल्या संविधानात धर्म स्वातंत्र दिले आहे त्याचे कायद्याच्या चौकटीत सर्वानी पालन करावे इतकेच. तरी सुद्धा हे धार्मिक युद्ध का पेटवायचे याच्या खोलात जाणे क्रमप्राप्त. भारतातील सर्वच राजकीय पक्षांचा जन्म राज्य घटनेतून झालेला आहे. म्हणजे, सर्वच राजकीय पक्षांना कायद्याच्या अधीन राहून काम करावे लागते. सर्वच राजकीय पक्ष संविधानाच्या कायद्यातून उदयाला आले खरे पण ते संविधानवादी आहेत काय? समता, स्वातंत्र्य, बंधुता हे मूल्य कोणत्या पक्षाचे आहे? किंबहुना संविधान उद्देश पत्रिकेप्रमाणे आपले राजकीय पक्ष कार्यरत आहेत का? यावर विचार केल्यास सर्वच पक्ष हे संविधान विरोधी आहेत असे म्हणायला वाव आहे.  भारतातील राजकीय सांगाडा हा सामाजिक सांगाड्यावर उभा आहे आणि सामाजिक सांगाडा हा जात- धर्माने माखलेला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यकर्त्यांना इथे धर्म आणि जात याच्या आधारावरच राजकारण करावे लागते. पण, संविधानाने दिलेला विशाल मानवमुक्तीच्या जो सिद्धांत आहे तो समजून घेण्याएवढे आपले धोरणकर्ते प्रगल्भ नाहीत असे अजिबात नाही. मुळात खुट्टी अशी आहे की, सांस्कृतिक सत्तेच्या आधारे धार्मिक, राजकीय, समाजिक, आर्थिक, सत्तेच्या नाड्या आरएसएस ने आपल्या हाती घेतल्या आहेत. संघ परिवाराने संपादित केलेल्या सांस्कृतिक मुद्दलावरचे व्याज म्हणजे भाजप आहे. आता संघ- भाजप सोडता इतर पक्षांची सांस्कृतिक भूमिका आणि कृती कार्यक्रम काय? तर काहीच नाही. मग काय? ते चालवतात हनुमान चालीसा… मराठीत अजून दुसरी एक म्हण आहे, कमळ भुंग्याला अन चिखल बेडकाला… महाराष्ट्रात राजकारण करणारे पक्ष दोन मुद्यावर राजकारण करणारे आहेत. ते म्हणजे, एक हिंदुत्व आणि दुसरे पुरोगामीत्व. पण जो हिंदुत्ववादी असतो तोच राष्ट्रवादी असतो हे आपल्या लोकांना कळत नाही. ते महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतरही कळले नाही. आपले जे पक्ष आहेत त्या एकप्रकारे जातीच्या संघटना आहेत. काँग्रेस ही धर्मशाळा आहे असे घटनाकार म्हणायचे. आता या काँग्रेसमध्ये हिंदुत्ववादी, कम्युनिष्ट, समाजवादी आहेत. आपले माजी राष्ट्रपती  प्रवण मुखर्जी काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका निभावली म्हणून भाजपने त्यांना भारतरत्न दिला. असो, भारतामध्ये समता आधारित समाज निर्माण झाल्यास धर्मद्वेषाचा उन्माद माजणार नाही. नसता मग, उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. 

COMMENTS