Homeताज्या बातम्यासंपादकीय

बहुमताचा अभाव

एक्झिट पोल अर्थात कलचाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाच्या विपरित परिणाम दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँगे्रसने भाजपला कडवी टक्कर दिल

कलचाचण्यांचा निष्कर्ष
अमृत महोत्सवी वर्ष आणि विकासाचा आलेख
चिन्ह गोठवले, पुढे काय… ?

एक्झिट पोल अर्थात कलचाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाच्या विपरित परिणाम दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँगे्रसने भाजपला कडवी टक्कर दिल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच काँगे्रसचे संख्याबळ मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. भाजपने केवळ श्रीराममंदिर आणि कलम 370 मुद्दयांना हात घालत आपण या निवडूका जिंकू असा आत्मविश्‍वास भाजपला नडल्याचे दिसून येत आहे. तर काँगे्रसने रोजगारनिर्मिती, महिलांच्या खात्यात 1 लाख रूपये जमा करण्याचे आश्‍वासन, संविधान बचाव यासारखे महत्वाचे मुद्दे काँगे्रसने आक्रमकपणे मांडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपला कडवी टक्कर देत आपले संख्याबळ मोठ्या प्रमाणावर वाढवल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता भाजपने काँगे्रसची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नव्हती. भाजपने आयकर विभागाच्या माध्यमातून काँगे्रसचे खाते सील केले होते. काँगे्रसने पत्रकार परिषद घेत आमच्या कार्यालयाचे लाईट बील भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे काँगे्रसची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. लोकसभा निवडणुका या खिलाडूवृत्तीने लढल्या गेल्या पाहिजे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक, झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केलेली अटक या सर्व बाजू पाहता भाजपविरोधात रोष व्यक्त होत होता. त्याचबरोबर महाराष्ट्रात दोन पक्ष फोडण्यात आले होते. एवढेच नव्हे तर त्या मूळ पक्षांना त्यांचे पक्षचिन्ह आणि नाव मिळू नये, याची तजवीज देखील करण्यात आली होती. मात्र यातून दोन्ही पक्ष तावून सुलाखून निघत त्यांनी भाजपला चांगलीच मात दिल्याचे दिसून येत आहे.

शिवाय महाराष्ट्रात असे राजकारण चालणार नाही, असाच कौल जनतेने दिला आहे. या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनेक प्रचारसभेत विरोधी उमेदवारांना दम भरला होता. डॉ. अमोल कोल्हे खासदार होतोच कसा, असा इशारा दिला होता. त्याचबरोबर मी कामाचा माणूस असून, विकासकामे करण्यासाठी मतदानांची मागणी अजित पवारांनी केली होती. मात्र आपण अनेकांना निवडून आणण्याचा दावा करणार्‍या अजित पवारांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही, आणि 2024 च्या निवडणुकीत स्वतःच्या पत्नीला निवडून आणता आलेले नाही. त्यामुळे दादांना जनतेने स्वीकारले नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षच ताब्यात घेतला असला तरी, त्यांना आपले 13 खासदार निवडून आणता आलेले नाही. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची याचा कौल जनतेने दिलेला आहे. शिवाय भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रस फोडल्यामुळे भाजपचे महाराष्ट्रातील संख्याबळ किती घटले, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ भाजपवर आलेली आहे. खरंतर केवळ अडीच वर्षांचा प्रश्‍न होता, जर भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रस फोडली नसती आणि भाजपने जर पुढील अडीच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून राहण्यास पसंदी दिली असती तर, आजमितीस भाजपने किमान 30 तरी जागा जिंकल्या असत्या. मात्र भाजपने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आपल्या जाग कमी करून घेतल्या आहेत. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो, मात्र यंदा विदर्भात काँगे्रसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजपचे नितीन गडकरी यांची जागा सोडल्यास इतर बहुतांश जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील 10 जागापैकी 7 जागांवर महाविकास आघाडी पुढे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भात भाजपची पुरती पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. भाजपने लोकसभा निवडणुका केवळ दोन मुद्दयांवर लढल्याचे दिसून येत आहे. राममंदिर आणि कलम 370 चे मुद्दे पुढे आणत भाजपने प्रचार केला. मात्र सर्वसामान्यांसाठी आपण काय करणार आहोत, याचा कोणताही मुद्दा भाजपने मांडला नाही. शिवाय भाजपकडे पंतप्रधान मोदी वगळता कोणताही आश्‍वासक चेहरा नाही, ज्यामुळे भाजप निवडुका जिंकतील. त्यामुळे भाजपसाठी आता आत्मचिंतनाची वेळ ओढवल्याचे दिसून येत आहे. भाजप जरी सत्ता स्थापन करू शकत असली तरी, भाजपला 2024 मध्ये सत्ता करणे अवघड करणे जाणार यात शंका नाही. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून मित्रपक्ष जोडण्याची चाचपणी सुरू आहे. त्यामध्ये नितीशकुमार आणि तेलगु देसमचे चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेण्यासाठी चर्चा करण्याची तयारी काँगे्रसने सुरू केली आहे. मात्र भाजपचे संख्याबळ सत्तास्थापनेसाठी जवळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप काठावरचे सरकार स्थापन करू शकते. 

COMMENTS