सातारा : मोबाईलच्या या काळात ग्रंथमैत्री कमी होताना दिसत आहे. आजची तरुणाई, वाचन, माहिती अभ्यास, याच्या सखोल वाचनापासून दूर होत आहे. मोबाईलमध्ये

सातारा : मोबाईलच्या या काळात ग्रंथमैत्री कमी होताना दिसत आहे. आजची तरुणाई, वाचन, माहिती अभ्यास, याच्या सखोल वाचनापासून दूर होत आहे. मोबाईलमध्ये सगळे अडकले आहेत. मोबाईलचा विचारपूर्वक वापर करायला पाहिजे. पूर्वीच्या काळात वाचनाशिवाय आम्हाला दुसरे काहीच नव्हते, चांदोबा, किशोर यांनी आमचे भावविश्व घडवले. एखादी गोष्ट 21 दिवस सतत करा. रोज दोन पाने वाचली तर 21 दिवस तर पुढे वाचनाची सवय लावते.आमच्या कॉलेजमध्ये आम्ही पुस्तके वाचायला लावतो. पुस्तके जीवनावर संस्कार करीत असतात. पुस्तकाशी मैत्री केली की विविध प्रकारचे ज्ञान आणि आनंद आपल्याला मिळत असतो’ असे मत सुशीला शंकरराव गाढवे महाविद्यालयातील मराठी विभागातील प्राध्यापिका व लेखिका डॉ.प्रतिभा पाटणे यांनी व्यक्त केले. त्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाने उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ‘तारुण्याच्या उंबरठ्यावर’ या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वाचनाच्या संदर्भात बोलताना त्या पुढे म्हणाल्या की ‘मला बहिणाबाई चौधरी माझ्या आयडॉल वाटतात. स्वयंमवर जाऊन विद्यार्थ्यांनी अनेक व्याख्याने ऐकली पाहिजेत. कोरोना काळात आमच्याकडे अमेरिकेकडून वाचनासाठी लोक सहभागी झाले. कोणताही विद्यार्थी कोणताही विषय वाचू शकतो. प्रत्येकाला आता संशोधन करता आले पाहिजे. प्रत्येकजण चंद्रावर जाणार नाही पण सभोवतालचे प्रश्न आपण सोडवू शकतो. आपली विचार करण्याची क्षमता पुस्तकाने वाढते. पु.ल.देशपांडे यांची पुस्तके वाचली पाहिजेत. त्याने निखळ मनोरंजन होते. पुस्तके वाचण्यासाठी जगले पाहिजे. पुस्तके वाचणारा माणूस आत्महत्या करू शकणार नाही. अग्निपंख हे अब्दुल कलाम यांचे पुस्तक खूप प्रभावी आहे. त्यांचे एक वाक्य मला खूप आवडते. ते म्ह गवणतात की आपण खूप मोठी स्वप्न बघितली तर काही स्वप्ने पूर्ण होतात’. चांगल्या वाईटाची समज पुस्तकातून मिळते. वाचनातून मनावर संस्कार होतात. पुस्तके परिवर्तन घडवू शकतात. ग्रंथ हे नकारात्मक विचार काढून टाकतात. विद्यार्थी दशेत पैसे कसे मिळवावेत यासाठी पुस्तके मार्गदर्शन करीत असतात. प्रदेशातील विविध गोष्टींचे ज्ञान मिळते.. मोबाईलवर देखील पुस्तके वाचावीत. समाजमाध्यमातील पोस्ट वाचताना चांगले काय हिताचे काय ते शोधून घ्यावे असे त्या म्हणाल्या. प्रारंभी प्रा.प्रियांका कुंभार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले. या कार्यक्रमास प्रा.विश्वजित जाधव, प्रा.डॉ.कांचन नलवडे, प्रा.शरद ठोकळे, प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे, प्रा. श्रीकांत भोकरे यांनी आभार मानले. मराठी ,इंग्रजी, इतिहास विभागातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
वाचनाने चांगुलपणाने जगण्याची प्रेरणा मिळते ः डॉ. वाघमारे – अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले, ‘श्रवण ,भाषण,लेखन व वाचन ही भाषिक कौशल्ये आहे. वाचन जो करत नाही, अनुभव जो घेत नाही त्याला ज्ञान कसे मिळेल ? मिळालेल्या आयुष्यात जग समजून घेण्यासाठी सतत जिज्ञासू राहिले पाहिजे. हे जीवन घडवण्याचे दिवस आहेत. मला उत्तम कांबळे यांचे वाट तुडवताना हे पुस्तक फार आवडले. वाचनाने जीवन अधिक चांगुलपणाने जगण्याची प्रेरणा मिळते. वाचन हा मनाचा व्यायाम आहे. ज्ञान आविष्कार करण्यासाठी वाचन करून मनात ज्ञानसंचय करायला हवा. पुस्तक मागणारी आणि मनापासून वाचणारी मुले मला आवडतात. वाचन आपल्याला नव्या जगात नेते. आपले शब्दज्ञान वाढते. आई समजून घेताना हे पुस्तक वाचा. जपान मधील तोत्तोचान हे पुस्तक वाचावे. वाचनाने मनपरिवर्तन होते, असे ते म्हणाले.
COMMENTS