Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी

कोपरगांव/प्रतिनिधी : कोपरगांव विधानसभा मतदारसंघात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मतदारसंघात पावसाने काही ठिकाणी 21 दिवसांपासून 25 दिवसांपर्यंत उघडी

निळवंडे लाभ क्षेत्रातील पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या
अण्णा भाऊ साठे योजनेच्या 1.65 कोटींच्या कामास मान्यता
कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या

कोपरगांव/प्रतिनिधी : कोपरगांव विधानसभा मतदारसंघात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मतदारसंघात पावसाने काही ठिकाणी 21 दिवसांपासून 25 दिवसांपर्यंत उघडीप दिल्याने पिके वाळून चालल्याने शेतकर्‍यांच्या पदरात काहीही पडणार नाही.याची गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, चालू हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने मतदारसंघात खरीप पेरण्या होतील की नाही याबाबत शेतकरी साशंक होते. परंतु पडलेल्या अत्यल्प पावसावर जुलै महिन्यात शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होवून बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. मात्र पेरण्या झाल्यानंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही अशी एकवेळ अवस्था झाली होती. परंतु कसेबसे पेरलेले उगवले व सर्वच पिके जोमात असतांना पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे मागील 25 दिवसापासून मतदारसंघातून पाऊसच गायब झाल्यामुळे निसर्गाचा लहरीपणा काय असतो? याचा प्रत्यय यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना आला आहे. याचा मोठा परिणाम खरीप पिकाच्या उत्पादनावर होणार असून शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडणार नाही यामुळे शेतकर्‍यांचे पैसे आणि मेहनत दोन्हीही वाया जाणार आहे.

पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप कोपरगाव मतदारसंघात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही. पेरणी होताच धो-धो बरसणारा वरुणराजा यावर्षी ऐन गरजेच्या वेळीच गायब झालेला दिसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातून खरीप तर जाणारच आहे. परंतु सरासरीहून कमी पाऊस झाल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी देखील खालावली जावून भविष्यात शेतकर्‍यांना जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याच्या समस्या उद्भवणार आहे. अशा चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कोपरगाव मतदारसंघात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा. खरीप हंगामातील बाजरी,मका,कापूस, तूर,सोयाबीन,भुईमुग, कांदा आदी पिकांचे 100 टक्के नुकसान होणार असल्यामुळे आगावू पिक विमा रक्कम सरसकट द्यावी. शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना भरघोस मदत जाहीर करावी. अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

COMMENTS