Homeताज्या बातम्यासंपादकीय

कलचाचण्यांचा निष्कर्ष

लोकसभा उत्सवाची सांगता झाल्यानंतर लगेचच वृत्तवाहिन्यांनी कलचाचण्यांचा निष्कर्ष जाहीर केला. खरंतर यंदा विरोधकांनी सत्ताधार्‍यांनी चांगलीच फाईट दिल

राजधानीतील आक्रोश
शेतकर्‍यांची कोंडी
महाराष्ट्रातील राजकारणाची खिचडी

लोकसभा उत्सवाची सांगता झाल्यानंतर लगेचच वृत्तवाहिन्यांनी कलचाचण्यांचा निष्कर्ष जाहीर केला. खरंतर यंदा विरोधकांनी सत्ताधार्‍यांनी चांगलीच फाईट दिली. दोन टप्प्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुस्लिमविरोधी वक्तव्यासोबत इतर वक्तव्य त्यांच्याविरोधात जाणारे होते. ज्याचा फायदा विरोधकांना होईल असा निष्कर्ष होता, मात्र पाचव्या टप्प्याच्या वेळी सत्ताधार्‍यांना पुन्हा एकदा आपला फॉर्म गवसल्याचे दिसून आले. त्याचाच निष्कर्ष म्हणजे भाजप पुन्हा सत्तेत येईल असा स्पष्ट निष्कर्ष दिसून येत आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा सक्षम विरोधक, चेहरा विरोधकांकडे नाही, हे त्यांनादेखील कबूल करावे लागेल. राहुल गांधी काँगे्रसच्या मुशीत तयार होत असले तरी, थेट मोदींना अंगावर घेईल असा चेहरा नसल्यामुळे पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर येईल असे संकेत दिसून येत आहे. कलचाचण्यांनी एनडीए पुन्हा एकदा 350 पेक्षा अधिक जागा मिळवतील असा अंदाज व्यक्त केला आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यावेळी असे वातावरण होते की, भाजप जवळपास 200 च्या आसपास जागा मिळवतील, त्यापेक्षा ते पुढे जाणार नाहीत. मात्र मोदी यांनी शेवटच्या काही टप्प्यात जादूची कांडी फिरवावी तशी कांडी फिरवत पुन्हा एकदा जनमत आपल्या बाजुने फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजप अनेक राज्यांत दमदार कामगिरी करण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात मात्र भाजपला फटका बसण्याचा अंदाज आहे. कारण गेल्या 2019 मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा भाजपच्या 6 जागा घटतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 23 तर महायुती 24 जागा मिळवतील असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना 9 तर, काँगे्रस 8, शरद पवारांची राष्ट्रवादी काँगे्रस 6 जागा मिळवतील असा अंदाज असून, भाजप यावेळेस केवळ 17 जागांवरच विजय मिळवेल तर, एकनाथ शिंदेंची शिवसेना केवळ 6 तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँगे्रस केवळ 1 जागा मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर एक जागा अपक्षाला जाणार आहे. मग तो अपक्ष उमेदवार विशाल पाटील, की वंचितचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर असतील याचा निकाल 4 जून रोजीच जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात भाजपच्या पदरी बहुतांश प्रमाणात पदरी अपयश पडत असले तरी, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या पदरी मात्र पुरती निराशा पडण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटाला आपल्या 13 जागा वाचवता येणार नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नेमके काय होईल, ते आत्ताच सांगता येत नसले तरी, त्याचे पूर्वपडसाद या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येऊ शकतात. खरंतर काँगे्रसकडे नेते असूनही, काँगे्रस आपले बालेकिल्ले सांभाळू शकलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी आणि विशेषतः काँगे्रसने काही बाबी समजून घेण्याची गरज आहे. भाजप 2019 नंतर सत्तेवर आल्यानंतर भाजपने 2022 पासूनच 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी करण्याचे काम सुरू केले होते. श्रीराममंदिरांचे त्यांनी केलेला सोहळा, त्यातून त्यांनी जोडलेला मतदार, त्यासोबतच मोदीजी इव्हेंट करण्यात पटाईत आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधार्‍यांना कशी मात देता येईल, याविषयी रणनीती आखण्याची गरज आहे. विरोधकांनी यावेळेस आपला जाहीरनामा अतिशय दर्जेदार बनवला होता, त्यातील घोषणा प्रभावी होत्या. त्यामुळे यावेळेस तुल्यबळ लढत होण्याची शक्यता होती. खरंतर यावेळेस मोदीजी जरी सत्तेवर येत असल्याचे दिसून येत असले तरी, भाजपची मतांची टक्केवारी घसरल्याचे दिसून येणार आहे. त्यामुळे विरोधकांना चांगली संधी असतांना देखील त्यांनी ती पुन्हा दवडल्याचे दिसून येत आहे. अनेक पक्षांना आपला सवतासुभा हवा आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्यास पसंती दिली, त्यासोबतच पंजाबमध्ये आप स्वतंत्र लढला, त्यामुळे विरोधकांचे ऐक्य कायम नसल्याचे दिसून येत आहे.  

COMMENTS