नवी दिल्ली : भारत मंडपम येथे सुरू असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादाच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्य
नवी दिल्ली : भारत मंडपम येथे सुरू असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादाच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेस मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. युवक काँग्रेसने परिषदेसंदर्भात केलेल्या आंदोलनावर भाजपने तीव्र आक्षेप घेत, हा प्रकार देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
निदर्शनांदरम्यान काही कार्यकर्त्यांनी अडथळे ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्यासह काही पदाधिकार्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना तुगलक रोड येथील पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. सुमारे एका तासानंतर इशारा देऊन त्यांची मुक्तता करण्यात आली. या आंदोलनात माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार मनोज तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार भाटिया, विष्णु मित्तल, प्रवीण शंकर कपूर, उपमहापौर जयभगवान यादव, जिलाध्यक्ष वीरेन्द्र बब्बर, माया विष्ट यांसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. प्रदेशाध्यक्ष सचदेवा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद हा कोणत्याही एका पक्षाचा कार्यक्रम नसून संपूर्ण राष्ट्राचा उपक्रम आहे. अशा व्यासपीठावर आंदोलन करून गोंधळ निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, देशाच्या नवोन्मेष क्षमतेचे आणि तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन जगासमोर होत असताना अशा प्रकारचे आंदोलन हे नकारात्मक राजकारणाचे उदाहरण आहे. सचदेवा यांनी काँग्रेसवर टीका करताना देशहितापेक्षा राजकीय भूमिका महत्त्वाची मानली जात असल्याचा आरोप केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रगतीची दखल घेतली जात असताना देशांतर्गत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, या घडामोडींमुळे राजधानीत राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत या विषयावरून आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS