Homeताज्या बातम्यासंपादकीय

संपत्तीच्या गुर्मीतूनच बेधुंदशाही !

खरंतर संपत्तीचा उपभोग आपण आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी करण्यात येत होता. मात्र आजमितीस या संपत्तीचा माज वाढतांना दिसून येतो. यातून आपण काहीही कर

शपथविधीच्या निमित्ताने ..
मान्सूनचे शुभवर्तमान
कथनी आणि करणीतील फरक

खरंतर संपत्तीचा उपभोग आपण आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी करण्यात येत होता. मात्र आजमितीस या संपत्तीचा माज वाढतांना दिसून येतो. यातून आपण काहीही करू शकतो ही मानसिकता बळावत चालल्याचे दिसून येत आहे. पुण्यात नुकतेच एका उद्योगपतींच्या मुलाने अनीष आणि आश्‍विनी या दोघांना आपल्या आलिशान गाडीने चिरडले. यात त्या दोघांचा मृत्यू झाला. खरंतर या दोघांची काहीही चूक नसतांना त्यांची हत्या करण्यात आली. तरीही त्याचे कुणालाही सोयरसुतक नाही. कारण मुलगा हा एका बड्या उद्योगपतींचा असल्यामुळे त्याला सर्व काही विशेष ट्रीटमेंट पोलिसांकडून देण्यात येते. विशेष म्हणजे या मुलाचे मेडिकल करण्याचे सौजन्य पोलिस दाखवत नाही, तो अल्पवयीन असल्याचा फायदा पोलिस घेत होते, यावरून पोलिस एका आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रकार या घटनेवरून दिसून येतो. खरंतर बड्या बापाच्या वाया गेलेल्यांना धडा शिकविण्याची आणि कायदा नियम यांची समज देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. असे असतांना देखील आरोपीसाठी पोलिस बंदोबस्तात बर्गर, त्याच्या जेवणाची व्यवस्था केली जाते.

त्यामुळे व्यवस्थाच कशी धार्जिणी आहे, हाच यातून बोध होतो. कोण कुठले ते अनीष आणि आश्‍विनी, आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवण्यासाठी पुण्यात येतात आणि त्यांच्या भविष्याचा चुराडा असे बड्या बापाची वाया गेलेले मुले करतात, आणि पोलिस त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. ज्याने आपल्या गाडीने चिरडले तो आरोपी मुलगा हा केवळ 17 वर्षांचा आहे. तो नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. तो आपल्या दोन मित्रांसह कारमध्ये मुंढवा येथे कोझी या हॉटेल अँड बारमध्ये पार्टीसाठी गेला. त्या ठिकाणी त्याचे इतर 10 ते 12 मित्रदेखील होते. हॉटेलचे मालक प्रल्हाद भुतडा व मॅनेजर सचिन अशोक काटकर यांनी मुले अल्पवयीन असताना त्यांना मद्यपुरवठा केला. विशेष म्हणजे आरोपी अल्पवयीन असतांना देखील बापाने मुलाला कार दिली. या कारची आरटीओकडे नोंद नाही, तरीदेखील ही कार बिनधास्तपणे रस्त्याने फिरते, त्यातही बाप आपल्या 17 वर्षांच्या मुलाकडे तो अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील कारची चावी देतो, त्यामुळे आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही, काही दुर्घटना घडल्यास आपण पैशांच्या बळावर त्यावर मात करू अशीच गुर्मी यातून दिसून येते. त्यामुळेच हा मुलगा बिनधास्तपणे बारमध्ये जातो, त्याला बिनाबोभट काहीही माहिती न घेता मद्य मिळते. मुलांच्या वयाची खात्री न करता मद्य दिले. तयसेाबतच मुलाच्या वडिलांनी त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्शे महागडी कार ही मुलास कार चालवण्याचे प्रशिक्षण झालेले नसताना दिली व त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानादेखील नसल्याचे स्पष्ट झाले. वास्तविक पाहता न्यायालयाने आरोपीला दिलेल्या शिक्षेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यात पोलिसांची चुकी आहे. पोलिसांनी जी कलमे लावली, त्यानुसार न्यायालयाने शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीस आरटीओला भेट देऊन वाहतूक नियमांची माहिती घेऊन 15 दिवस येरवडा विभागातील पोलिसांसोबत वाहतूक नियंत्रण करावे, वाहतूक जागृतीचे फलक रंगवावे लागणार आहेत. मुक्तांगण येथे मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन त्याला उपचार घ्यावे लागणार आहेत. रस्ते अपघातांचे परिणाम आणि त्यावरील उपाय या विषयावर आरोपीला कमीत कमी 300 शब्दांचा निबंध लिहावा लागणार आहे. पालकांनी त्याला वाईट प्रवत्तीपासून दूर ठेवावे या अटींवर त्यास साडेसात हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उमटली. त्यानंतर आरोपीच्या वडिलांना संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आले. मात्र ही मानसिकता ही गुर्मी संपत्तीची आहे. आपण पैशांच्या बळावर काहीही विकत घेवू शकतो, अशा मानसिकतेला कायद्याने चाप बसवण्याची खरी गरज आहे. 

COMMENTS