अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरी आंदोलन साम, दाम, दंड, भेद वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकर्यांना संपवण्याचा घाट आता भाजप सरकारने चालवि
अहमदनगर (प्रतिनिधी)-
शेतकरी आंदोलन साम, दाम, दंड, भेद वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकर्यांना संपवण्याचा घाट आता भाजप सरकारने चालविलेला असल्याचा आरोप करीत, उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकर्यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि.11 ऑक्टोबर) रोजी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
या महाराष्ट्र बंद मध्ये राष्ट्रवादी देखील उतरणार असून, आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात या घटनेचा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध नोंदवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी दिली.
उत्तर भारतातील शेतकरी गेली अनेक महिने आपल्या न्याय, हक्कासाठी आंदोलन करुन आपले म्हणणे केंद्रातील मोदी सरकार कडे पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु वेळोवेळी हे आंदोलन भाजप सरकार तर्फे दाखवण्याचा व भरकटविण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यामध्ये त्यांना पूर्णतः यश आलेले नाही. शेवटी हे आंदोलन दहशती द्वारे शेतकर्यांना संपवण्याचा घाट आता भाजप सरकारने चालविलेला आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर या गावातील शेतकर्यांना केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली चिरडून टाकण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय व तीव्र चीड आणणारा आहे. भारत कृषिप्रधान देश असताना या देशात शेतकर्यांना अशी वागणूक मिळत आहे. अशावेळी महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून, या निर्दयी कृत्याचा निषेध म्हणून सोमवारी महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश मध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र सरकारच्या या कृतीचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
COMMENTS