पुण्यात आजपासून सात दिवसांची टाळेबंदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात आजपासून सात दिवसांची टाळेबंदी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात शनिवारपासून (दि. ३) सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

तोंडात सुतळी बॉम्ब ठेवत तरुणाची आत्महत्या
वडिलांनी मारहाण केल्याने १४ वर्षीय मुलीने गाठलं प्रियकराचं घर
बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतण्याचा मृत्यू

पुणे/प्रतिनिधी: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात शनिवारपासून (दि. ३) सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  सायंकाळी सहा  ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. दिवसभर जमावबंदी लागू असणार आहे. हाॅटेल, बार, माॅल, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. पीएमपी बससेवा बंद राहणार आहे. 

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले,  की लोकांना त्रास होऊ नये, म्हणून मध्यम मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये नियम कडक केले जाणार आहेत. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या तपासणीवर भर देण्यात येणार आहे. त्यांची ब्लड टेस्ट करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. खासगी रुग्णालयांच्या बिलांचे आॅडिट पुन्हा सुरू केले जाईल. पॅाझिटिव्हिटी २७ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांवर गेली आहे. आठवड्याचा ग्रोथ रेट हाच राहिला तर दिवसाला नऊ हजार रुग्ण सापडतील. हॉस्पिटल बेडसंदर्भात काल बैठक झाली. काही रुग्णालये शंभर टक्के कोविड हॅास्पिटल करण्याची वेळ येऊ शकते.

लसीकरणाबाबत बोलताना राव म्हणाले, “पुण्यात सर्वांत जास्त लसीकरण सुरू आहे. शंभर दिवसांत लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन शंभर डेज सुरू करण्यात येणार आहे. मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे; पण ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहेत. पुण्याचे सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, की चेक पोस्ट, पेट्रोलिंग सुरू करणार आहोत. खासगी कार्यालयांवर काही बंदी नाही. आधीप्रमाणेच ती सुरू राहणार असून  शाळा, कॉलेज बंद राहणार आहे. पुण्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी राहणार आहे. शहरातील हॉटेलमध्ये सायंकाळी सहापर्यंत अन्नपदार्थ मिळतील; पण त्यानंतर ॲपद्वारे ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहे. पुण्यामध्ये निर्बंधाच्या नावाखाली लाॅकडाऊनच लावल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासूनच संचारबंदी लागू करण्याचे कारणच काय, असा प्रश्न विचारला जात आहे. सहा वाजल्यापासून संचारबंदीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यांना कामच करणे शक्य होणार नाही. हाॅटेलची वेळही सहा वाजेपर्यंतच केल्याने या उद्योगावर विपरीत परिणाम होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही त्रास होणार आहे. एकटे राहणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. पुण्यातील पीएमपी सेवा बंद करण्यासही विरोध केला आहे. भारतीय जनता पक्षानेही या निर्णयाला विरोध केला आहे. पुणे आणि  परिसरातून हजारो कामगार दररोज पीएमपी बसने प्रवास करून कामाच्या ठिकाणी जातात. त्यांना पोहोचता येणार नसल्याने उद्योगचक्रावर परिणाम होणार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.  संचारबंदी नको तर जमावबंदी करा, अशी मागणीही बापट यांनी केली.

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

मेडिकल दुकाने, दूध, भाजीपाला या अत्यावश्यक सेवांसह वृत्तपत्र सेवा सुरू राहणार आहे. औद्योगिक आस्थापना, कार्यालयांवर कोणतेही निर्बंध नाहीत. कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीची अट कायम आहे. किराणा मालाची दुकाने मात्र सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत, असे राव यांनी स्पष्ट केले.

कामावरून परतणा-यांना पोलिसांचा नसेल त्रास

सायंकाळी सहानंतर संचारबंदी असली, तरी कामावरून परतणा-यांना पोलिस त्रास देणार नाहीत. कारण बहुतांश कार्यालये सायंकाळी सहानंतरच बंद होतात, असे शिसवे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS