उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबर भारताचा नंबर लागणार ?

Homeताज्या बातम्याविदेश

उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबर भारताचा नंबर लागणार ?

सातवी टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून उपांत्य फेरीत खेळणाऱ्या शेवटच्या चार पैकी तिन संघ निश्चित झाले असून चौथ्या संघाचा निर्

महाराष्ट्र केसरी विजेत्यावर ना. एकनाथ शिंदे यांच्याकडून बक्षिसांचा वर्षाव
जयंत प्रिमियर कबड्डी लिग’च्या दुसर्‍या दिवशी जय हनुमान पतसंस्था टायगर्स हा संघ डॉर्क हॉर्स ठरला
18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात

सातवी टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून उपांत्य फेरीत खेळणाऱ्या शेवटच्या चार पैकी तिन संघ निश्चित झाले असून चौथ्या संघाचा निर्णय हा लेख तुमच्या हाती मिळेपर्यंत कदाचित आलाही असेल. अ गटातून इंग्लंड व ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाने उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. अ गटाचा विचार केला तर यामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका व बांगलादेश या सहा कसोटी दर्जा प्राप्त संघाचा समावेश होता, त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी या गटातून मोठी चढाओढ होती.

वनडेचा विद्यमान विश्वविजेत्या इंग्लंडने अ गटात शेवट पर्यंत वर्चस्व राखत सरस धावगतीसह अव्वल स्थान पटकविले. मात्र शेवटच्या साखळी सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावे लागल्याने त्यांच्या तथाकथीत महासत्तेला मोठा हादरा बसला.

अ गटातून उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दुसरा संघ कोण असेल हे शेवटच्या साखळी सामन्यात निश्चित झाले. या गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका यांचे प्रत्येकी पाच सामन्यातून आठ गुण झाले. इंग्लंडची धावगती या दोन संघापेक्षा सरस असल्याने त्यांना गुणतालिकेत प्रथम क्रमांक मिळाला. तर इंग्लंड व द. आफ्रिका सामन्यात आफ्रिका विजयी ठरले, परंतु त्यांना इंग्लंडला एकशे एकतीस धावांच्या आत रोखता न आल्याने द. आफ्रिकेला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं नाही.

याच गटात असलेला विद्यमान विजेता वेस्ट इंडिज संघ एका पेक्षा एक बलवान खेळाडूंसह खेळत होता. परंतु या स्पर्धेत ना संघ म्हणून वेस्ट इंडिज आपल्या लौकिकाप्रमाणे खेळू शकले ना त्यांचा कोणताही खेळाडू ! संपूर्ण स्पर्धेत विंडीजला एकच सामना जिंकता आल्याने आयसीसीच्या मानांकनानुसार विंडीज संघ सध्या नवव्या स्थानावर घसरले आहे. त्यामुळे सन दोन हजार बावीस मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आठव्या टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी विंडीजला पात्रता फेरीचे सामने खेळून मुख्य स्पर्धेत स्थान मिळवावे लागेल. आपल्याला माहिती आहेच की, टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आयसीसी मानांकनात असलेल्या पहिल्या आठ संघानांच थेट प्रवेश मिळतो.

ब गटात भारत, पाकिस्तान, न्यूझिलंड व अफगाणिस्तान हे चार कसोटी संघ तर पात्रता फेरीतून आलेले स्कॉटलंड व नामिबिया हे संघ आहेत. अ गटाच्या तुलनेत ब गट सोपा होता. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या गटातून भारत व न्यूझिलंड या दोन संघांना सर्वांनी उपांत्य फेरीसाठी प्राधान्य दिले होते. पाकिस्तानची या स्पर्धेपूर्वीची कामगिरी विशेष अशी लक्षवेधक नसल्याने त्यांना कोणी भाव द्यायलाच तयार नव्हते. परंतु प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्यांची कामगिरी कमालीची उंचावली. यजमान भारताला त्यांनी सहजरित्या हरवून सर्वांनाच चकीत करत वाटेतील छोटे -मोठे काटे सहज छाटले व उपांत्य फेरीसाठी ब गटातून अव्वल स्थान मिळविले.

टिम इंडिया पाकिस्तान व न्यूझिलंड विरूध्द आपले सुरुवातीचे सामने हरल्याने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान धोक्यात आले. मात्र भारताने पुढील दोन सामने सरस धावगतीसह जिंकून ब गटात सरासरी धावगतीत सर्वोच्य स्थान मिळविले. त्याचबरोबर त्यांचा शेवटचा साखळी सामना नवख्या नामिबियासोबत असल्याने त्याच्यातील विजय ग्रहीत धरत टिम इंडिया सहा गुण मिळविल. तत्पूर्वी न्यूझिलंड व अफगाणिस्तान या दोन संघात होणाऱ्या सामन्याला महत्व प्राप्त झाले आहे. हा सामना अफगाणिस्तान जिंकले तर भारताचा उंपात्य फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र न्युझिलंड जिंकले तर भारतासाठी सातवी टिट्वेंटी विश्वचषक स्पर्धा तेथे समाप्त होईल. या महत्वपूर्ण सामन्यात अफगाणिस्तान चमत्कार करतो का एवढीच उत्सुकता टिम इंडियाच्या समर्थकांची असणार यात कुठलेच दुमत नसेल.

लेखक : –  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत.

COMMENTS