आ. लंके व देवरेंनी समन्वयाने काम करावे; अधिकारी महासंघाच्या कुलथेंचा सल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. लंके व देवरेंनी समन्वयाने काम करावे; अधिकारी महासंघाच्या कुलथेंचा सल्ला

अहमदनगर-/प्रतिनिधी-पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोविड काळात खूप चांगले काम केले आहे तर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे याही स्वाभिमानी व उत्तम का

तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार?; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल, सुनावणीकडे लक्ष
आमदार निलेश लंकेचे खासदार विखेंना थेट आव्हान…तर लोकसभेच्या रिंगणात उतरणार
अण्णांनाही नकोत पारनेरला देवरे; लंके यांनी भेटून दिला सहा पानी अहवाल

अहमदनगर-/प्रतिनिधी-पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोविड काळात खूप चांगले काम केले आहे तर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे याही स्वाभिमानी व उत्तम काम करणार्‍या आहेत. त्यामुळे त्यांनी आपसात वाद न करता समन्वयाने काम करून जनतेचे प्रश्‍न सोडवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक-मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी बुधवारी येथे केले.
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीनिमित्त कुलथे व राज्य सरचिटणीस विनायक लहाडे नगरला आले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट त्यांनी घेतली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या दालनात जिल्हा समन्वय समितीची बैठकही त्यांनी घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा समन्वय समितीचे सचिव विठ्ठलराव गुंजाळ उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलथे यांनी लंके-देवरे वादावर भाष्य केले. ते म्हणाले,आ. लंके यांनी कोविड काळात चांगले काम केले आहे व ते आम्ही पाहिलेही आहे. पण त्याचबरोबर देवरे यांचेही काम चांगले आहे. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या चर्चेत तथ्य नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आपसात भांडण्यापेक्षा समन्वय ठेवून जनतेची कामे करावीत, जनतेचे प्रश्‍न सोडवावेत, अशी महासंघाची भूमिका आहे. त्यांनी आपसातील वाद वाढवू नयेत, असेही कुलथे यांनी आवर्जून सांगितले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनीही परस्पर समन्वयाने व सामंजस्याने जनतेचे प्रश्‍न तत्परतेने सोडवावे, असाच महासंघाचा संदेश असल्याचेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

अनुकंपाची सुविधा
शासकीय कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा योजनेनुसार शासकीय नोकरी मिळते. पण राजपत्रित अधिकार्‍यांसाठी ही योजना नव्हती. पण राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनाकडे पाठपुरावा करून तसा निर्णय घेण्याची मागणी केली होती. तिची पूर्तता लवकरच होणार असून राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या कॅबिनेट बैठकीत राजपत्रित अधिकार्‍यांच्या पाल्यांनाही अनुकंपा तत्वाखाली शासकीय नोकरी देण्याचा निर्णय होणार आहे, असे सांगून कुलथे म्हणाले, मंत्रालयाच्या कामानिमित्त राज्यभरातून अधिकारी मुंबईत येतात. त्यांना तेथे राहण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे बांद्रा येथे 8 मजली इमारत बांधली जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी 10 कोटीचा निधी मंजूर केला आहे. येथील 100 कोटीची जागा राज्य सरकारने नाममात्र 1 रुपयात महासंघाला दिली आहे. राज्यभरातील अधिकार्‍यांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये देणगीरुपाने 7 ते 8 कोटी रुपये महासंघाने संकलित केले असून, लवकरच या इमारतीचे बांधकाम सुरू होणार असल्याचे कुलथे यांनी सांगितले.

त्यावर भाष्य करणार नाही
देवरे-लंके वादाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पाचशेवर महिला तहसीलदार अशाच राजकीय दबावात असल्याचा दावा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला होता. त्याबाबत विचारले असता, राजकीय नेत्यांच्या मुद्यांना उत्तर देण्यास महासंघ बांधिल नाही, त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे कुलथेंनी स्पष्ट केले. तसेच लोकप्रतिनिधींकडून अधिकार्‍यांना शिवीगाळ होते, या वाघ यांच्या दुसर्‍या मुद्यावरही बोलण्यास कुलथे यांनी स्पष्ट नकार दिला.

COMMENTS